मुंबई : एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) भारताला आतापर्यंत सुमारे तीन अब्ज डॉलर्सचा अर्थपुरवठा केला आहे. बँकेने भारतातील गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला आहे.
‘एआयआयबी’च्या संचालक मंडळाने ऑक्टोबरमध्ये दोन प्रकल्पांसाठी एकूण ५७५ दशलक्ष डॉलर्सची मंजुरी दिली आहे. अपारंपरिक ऊर्जा, पॉवर ट्रान्समिशन व जल पायाभूत सुविधा यातील खासगी भांडवल गुंतवणुकीला चालना देण्याची अपेक्षा आहे.
भारत सरकारला देण्यात आलेल्या ५०० दशलक्ष डॉलर्सच्या कर्जामुळे मुंबईतील उपनगरी रेल्वे जाळ्यातील कामाला गती मिळणार आहे. हा निधी, मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरांना जोडण्याच्या हेतूने उपनगरी रेल्वे सेवेचा विस्तार करण्यासाठी योगदान देणार आहे. या प्रकल्पात पनवेल व कर्जत या भागांदरम्यान नवे उपनगरी रेल्वे कॉरिडॉर (२८ किलोमीटर) बांधले जाणार आहेत.
‘गेल्या चार वर्षांमध्ये, ‘एआयआयबी’ची भारतातील गुंतवणूक लक्षणीयरित्या वाढली आहे. बँक भारताच्या विकासासाठी पाठिंबा देत असल्याने, यापुढे सरकारच्या प्राधान्यक्रमानुसार बँक आपली धोरणे आखणार आहे,’ असे ‘एआयआयबी’चे उपाध्यक्ष व मुख्य गुंतवणूक अधिकारी डी. जे. पांडियन यांनी सांगितले.